
रत्नागिरी, 31 ऑक्टोबर, (हिं. स.) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत आज पोलीस दलामार्फत 'रन फॉर युनिटी'मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
'रन फॉर युनिटी' अर्थात एकता दौडीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हिरवा झेंडा दाखविला. पोलीस संचलन क्रीडांगणावरुन सुरू झालेल्या या एकता दौडीची सांगता भाट्ये बीचवर झाली.
सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या एकता दौडला आज सकाळी येथील पोलीस संचलन ग्राऊंडवरुन जिल्हाधिकारी जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक निलेश माईणकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महामुनी यांनी उपस्थित सर्वांना शपथ दिली. 'मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासीयांमध्ये हा संदेश पोहोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचासुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे. उपस्थित सर्वांनी ही शपथ घेतली.
यानंतर जेल नाका, जयस्तंभ मार्गे ही दौड भाट्ये बीच येथे आली. तेथे दौडीची सांगता झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी