
ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील वाहतूक विभागाच्या वाढत्या दंडकेंद्रित कार्यपद्धती, निष्काळजी व्यवस्थापन आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या त्रासाविरोधात सामाजिक कार्यकर्ता अजय जया आणि अजय जया फाउंडेशन (AJF) यांनी आज तीन हात नाका सिग्नल येथे प्रभावी आंदोलन छेडले. ठाण्यातील अत्यंत गर्दीच्या आणि वाहतुकीने तुडुंब भरलेल्या या सिग्नलवर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उभे राहत नागरिकांचा आवाज बुलंद केला.
या आंदोलनादरम्यान “Citizens deserve service, not harassment. Stop treating citizens like fine-collection targets. #remove_trafficDCP_PankajShirshat” असा ठळक संदेश असलेला बोर्ड प्रदर्शित करण्यात आला. या संदेशाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या तथाकथित दंड वसुलीमुख्य धोरणाविरोधात ठाणेकरांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली.
अजय जया यांनी या मोहिमेसाठी कार्यकर्त्यांना विशेष सूचना देत सांगितले की, पीक अवरच्या वेळी वाहतूक व्यवस्थापनाऐवजी दंड वसुली व कागदपत्र तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे टाइम-स्टॅम्प फोटो आणि व्हिडिओ काढावेत. हे सर्व पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.
तीन हात नाका येथील यलो बॉक्स मार्किंगच्या गंभीर गैरवापराकडे अजय जया यांनी विशेष लक्ष वेधले. IRC Code BM-06 नुसार, वाहनचालक फक्त तेव्हाच यलो बॉक्समध्ये प्रवेश करू शकतो जेव्हा त्याला खात्री असते की त्याला तिथे थांबावे लागणार नाही. या जागेत वाहन थांबवणे वा पार्क करणे दंडनीय आहे. नियमांचा उद्देश वाहतूक कोंडी रोखणे असताना प्रत्यक्षात मात्र या भागाचा वापरच वाहतूक पोलिस तपासणीसाठी करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
उड्डाणपुलाखाली असलेल्या याच यलो बॉक्समध्ये १० ते १५ वाहतूक पोलिस मध्यरस्त्यात वाहन अडवून तपासणी करत उभे राहतात. या सिग्नलवर हिरवा दिवा फक्त १५–२० सेकंद असताना वाहनांची तपासणी करणे म्हणजे कोंडीला आमंत्रण देणे होय. दोन लेन पूर्णपणे ब्लॉक होत असल्याने शेकडो नागरिकांना या अनियमित कारभाराचा फटका बसतो. शिवाय जप्त केलेली वाहने सिग्नलखाली व रस्त्यात उभ्या असल्याने उर्वरित लेनही अडवल्या जातात आणि वाहतूक विस्कळीत होते.
या सर्व कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना अजय जया म्हणाले,
“वाहतूक पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य नागरिकसेवा आणि वाहतूक व्यवस्थापन असते, दंड गोळा करणे नाही. नागरिकांना सुरक्षितता, नियमबद्धता आणि सोईची गरज आहे — त्रासाची नाही.”
अजय जया फाउंडेशनने स्पष्ट केले आहे की हे आंदोलन एकदाचं नसून ठाण्यातील दंडकेंद्रित वाहतूक व्यवस्थेविरोधातील दीर्घकालीन जनआंदोलनाची ही सुरुवात आहे. पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारी आणि आकडेवारी अधिकाऱ्यांना सादर करून या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर