

- स्था.स्व. संस्था रणनीती, संघटनात्मक आढावा
नवी दिल्ली / मुंबई, ११ डिसेंबर (हिं.स.) : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती, महायुती फॉर्म्युला आणि मनपातील सत्तेची गणितं यावर कालच भाजपा वरिष्ठ नेते आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत उशिरा भेट घेतली. यावेळी आगामी निवडणुका तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेचा सारांश शाहांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणांबाबत चर्चा झाली.
फडणवीस, शिंदे, बावनकुळे आणि चव्हाण यांच्यात नागपूरात झालेल्या बैठकीत आगामी मनपा निवडणुकीतील धोरणे, संभाव्य महायुती, उमेदवारी, तसेच स्वतंत्र लढण्याच्या पर्याय अशी विविधांगी चर्चा झाली. या चर्चेचा सारांश चव्हाण यांनी थेट अमित शहा यांच्याकडे सोपवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, भाजपा राज्यात स्वतंत्र लढली तर काय संभाव्य परिणाम होऊ शकतात, महायुती झाली तर कोणत्या महापालिकांमध्ये सत्ता स्थिर राहू शकते, तसेच महायुती न झाल्यास कुठे धोका निर्माण होऊ शकतो, या सर्व गोष्टींचा तपशीलवार आढावा चव्हाण यांनी शहा यांच्यासमोर मांडला. त्याचबरोबर, कोणत्या मनपांमध्ये भाजप थेट महापौर बसवू शकते आणि महायुती टिकली तर कुठल्या मनपांमध्ये महायुतीचा संभाव्य महापौर बसू शकतो, याबाबतही सविस्तर आकडेवारी चर्चेत ठेवण्यात आली.
भाजपच्या अंतर्गत बैठका, रणनीती आणि दिल्लीतील अचानक झालेल्या या रात्रीच्या हालचालीमुळे राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये मोठे राजकीय वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी