
बीड, 23 डिसेंबर, (हिं.स.)। अनेक शेतकरी खरिप हंगामात ई-पिक पाहणीपासून वंचित राहिले. त्यामुळे शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी तलाठ्यामार्फत ऑफलाईन ई-पिक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही प्रक्रिया २४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या वर्षी हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे ई-पिक पाहणी करता आली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय खरेदी केंद्रावर कापूस, सोयाबीन विक्री करताना अडचणी येत आहेत. शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करून नोंद अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
माजलगाव, धारूर आणि वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी २४ डिसेंबर २०२५ पर्यंत आपल्या गावातील तलाठ्याकडे प्रत्यक्ष अर्ज सादर करावा, अर्ज करताना शेतकऱ्यांनी खाते क्रमांक, खातेदाराचे नाव, गट क्रमांक, पिकांचे नाव, पिकाचे क्षेत्र, खते खरेदी पावती आणि मागील खरीप हंगामातील पीक नोंद ही माहिती अचूकपणे द्यावी. असे सांगण्यात आले आहे
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis