कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन
नंदुरबार, २४ डिसेंबर (हिं.स.) : नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा अभेद्य गड बनवणारे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी सकाळी वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवापूर येथे उपचारादरम्यान त्या
सुरुपसिंग नाईक


नंदुरबार, २४ डिसेंबर (हिं.स.) : नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा अभेद्य गड बनवणारे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी सकाळी वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवापूर येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त येत आहे.

सुरुपसिंग नाईक यांचा जन्म १० सप्टेंबर १९३८ साली नवापूर तालुक्यातील नवागाव या आदिवासी लोकवस्तीच्या लहानशा गावात झाला. आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात सुरुपसिंग नाईकांनी 1962 मध्ये नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरू केली. १९६५ साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले. १९७२ साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मार्च १९७७ साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकिट मिळाले. 1980 साली त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आणि ते लोकसभेत पोहोचले.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले सुरुपसिंग नाईक हे गांधी परिवाराचे निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जात. 1985 पासून ते सातत्याने विधानसभेत निवडून आले. 2009 मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवत जिकून येत त्यांनी ही शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना खासदार असताना २५ सप्टेंबर रोजी १९८० रोजी महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. प्रथमच मंत्री झाल्यावर त्यांना समाजकल्याण व आदिवासी विकास खाते देण्यात आले. तेव्हापासून 2009 पर्यंत सातत्याने ते नवापूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. या कालावधीत आदिवासी विकास, समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वन व बंदरे अशा अनेक महत्त्वपूर्ण खाती त्यांनी सांभाळली.

2009 मध्ये डॉ विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावितांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला. मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी जिद्दीने लढा देत 2014 मध्ये शरद गावितांनाच पराभूत करत पुन्हा विधानसभेत पोहोचले. पुढे 2019 आणि 2024 मध्ये त्यांचे चिरंजीव शिरीष नाईक काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande