
सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार - महाजन
नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)।ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये राजकीय घडामोडींनी वेग आला असून उबाठा गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून अनेक निष्ठावंतांनी भाजपमध्ये प्रवेश केल आहे. भाजपचे संकटमोचक कुंभमेेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी भाजप पक्ष कार्यालय वसंतस्मृती येथे काँग्रेसचे शाहु खैरे, मनसेचे दिनकर पाटील, उबाठा गटाचे विनायक पांडे आणि शगर पवार गटाचे नितीन भोसले यांच्यासह इतरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील, त्यांचा मुलगा अमोल पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, काँग्रेसचे शाहु खैरे, माजी महापौर यतीन वाघ, अनिता पांडे, वैशाली भोसले, ऋतुराज पांडे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे समजल्यानंतर भाजपच्या महापालिका निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनी समाज माध्यमातून या पक्ष प्रवेशाला विरोध केला.
अण्णा आता हा तुमचा शेवटचा प्रवेश
प्रक्ष प्रवेश सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिनकर पाटील यांना उद्देशून अण्णा आता हा तुमचा शेवटचा प्रवेश असून तुम्ही कोठेच जायचे नाही. असे सांगितले. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि उबाठा गटातील अनेक वर्षांच्या निष्ठावतांना भाजपत प्रवेश केला आहे. कारण, देशात आणि राज्यात सर्वांचा भाजपवर विश्वास निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.
१०५ नगरसेवक निवडूण येणार
संपूर्ण देश भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून त्याचा परिणाम महापालिका निवडणुकांमध्ये दिसून येईल. नाशिकमध्ये भाजपचे १०५ नगरसेवक निवडूण येणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच नवीन कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांना राग येणे साहजिक आहे. परंतू पुढील काळात त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV