राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील रस्त्यांवर आता ई-बाईक टॅक्सी धावणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर याबाबत माहिती दिली.
यासंदर्भात सरनाईक यांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या माध्यमातून ई-बाईक टॅक्सीचा प्रस्ताव मंत्रिमडळाच्या मान्यतेसाठी ठेवला होता. सर्व मंत्र्यांनी महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत एकट्या प्रवाशांची गैरसोय होत होती. रिक्षा-टॅक्सीसाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडं द्यावं लागत होतं. आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय दूर होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. ई-बाईक टॅक्सीसाठी 15 किलोमीटर अंतराची मर्यादा ठेवण्यात आली असून 50 बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चांगली नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्याच ई-बाईकला आम्ही परवानगी देणार आहोत. ई बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राज्य सरकारने ठरवल्याचे सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, या ई-बाईक टॅक्सीसाठी प्रवासी भाड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
सरकार प्रवासी भाड्यासंदर्भातली नियमावली तयार करणार आहे. रिक्षात ज्या प्रवासासाठी 100 रुपये लागतात, तो प्रवास ई-बाईक टॅक्सीमध्ये 30 ते 40 रुपयांत कसा होईल त्याबाबत आम्ही नियोजन करत आहोत. येत्या एक ते दोन महिन्यांत ई-टॅक्सी बाईक सुरू होतील असे त्यांनी सांगितले. तसेच रिक्षा महामंडळाच्या सदस्य चालकांना 10 हजारांचं अनुदान देण्याचा प्रयत्न असून त्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रिक्षावाल्याच्या मुलाने किंवा मुलीने ई-बाईक टॅक्सी घेतली तर त्याला 10 हजार रुपयांचं अनुदान सरकार देईल, उर्वरीत रक्कम त्यांनी कर्ज रुपाने घ्यावी. जेणेकरून त्या मुलाच्या किंवा मुलीच्या खिशात एक रुपयाही नसताना त्याला ई-बाईक टॅक्सी घेता येईल असे सरनाईक यांनी सांगितले.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी