रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील आडवली पुजारेवाडी व मोगरे सडेवाडी या दोन गावांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.
गतवर्षी राजापूर तालुक्यातील एकूण ९ गावांमधील ११ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसल्याने या नऊ गावांतील अकरा वाड्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्याने त्यांना एका खा,गी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला होता. यावर्षी पुन्हा राजापूर तालुक्यातील अनेक गावे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत . त्यातच आता राजापूर तालुक्यातील आडवली पुजारेवाडी व मोगरे सडेवाडी या गावानी टॅंकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे . दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उन्हाच्या कडाक्यामुळे अजुन काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे .
गेल्या दोन वर्षात तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची अनेक कामेही अर्धवट स्थितीत असून अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीही आहेत. राजापूर शहरातही पाणीटंचाई जाणवू लागली असुन राजापूर पालिकेने १६ एप्रिलपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी