नवी दिल्ली, २१ एप्रिल (हिं.स.) : पुढील हजार वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत करण्याच्या गरजेवर आपला भर आहे. या सहस्रकातील 25 वर्षे उलटून गेली आहेत, नवीन शतकाचे आणि नवीन सहस्रकाचे 25 वे वर्ष आहेत. आज आपण ज्या धोरणांवर काम करत आहोत, जे निर्णय घेत आहोत, ते पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आज 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. त्यांनी लोक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कार देखील प्रदान केले.
कार्यक्रमात कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह; पंतप्रधानांचे प्रधान सचिव- शक्तिकांत दास; कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन; आणि प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास या वेळी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले आणि संविधानाचे 75 वे वर्ष आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती असल्याने या वर्षीच्या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. सरदार पटेल यांनी 21 एप्रिल 1947 रोजी नागरी सेवकांना 'भारताची पोलादी चौकट' असे संबोधले होते. त्या संस्मरणीय संबोधनाची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी आणि अत्यंत समर्पणाने देशाची सेवा करणारी सनदी सेवा, या सरदार पटेल यांच्या दृष्टिकोनावर भर दिला. विकसित भारत निर्माण करण्याच्या भारताच्या संकल्पाच्या संदर्भात त्यांनी सरदार पटेल यांच्या आदर्शांची प्रासंगिकता अधोरेखित केली आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीला आणि वारशाला मनापासून अभिवादन केले.
प्राचीन शास्त्रांमधील सुभाषिताचा उल्लेख करून ते म्हणाले की ज्याप्रमाणे रथ एकाच चाकाने पुढे जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे केवळ नशिबावर अवलंबून राहून यश मिळवता येत नाही. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि दृढनिश्चयाचे महत्त्व अधोरेखित करून, त्यांनी सर्वांना या सामायिक लक्ष्यासाठी दररोज आणि प्रत्येक क्षणी अथक परिश्रम करण्याचे आवाहन केले.
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांचा उल्लेख करून अगदी कौटुंबिक पातळीवर देखील नवीन पिढीशी संवाद साधताना प्रचंड गतीने होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला कालबाह्य झाल्याची जाणीव निर्माण होऊ शकते असे सांगून पंतप्रधानांनी प्रत्येक दोन ते तीन वर्षांनी होणाऱ्या गॅजेट्सच्या जलद उत्क्रांतीवर आणि या परिवर्तनात मुले कशी वाढत आहेत यावर प्रकाश टाकला. भारताची नोकरशाही, कार्यपद्धती आणि धोरणकर्ते एखाद्या कालबाह्य आराखड्यानुसार कार्य करु शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. वर्ष 2014 मध्ये झालेल्या लक्षणीय परिवर्तनाबद्दल ते म्हणाले की अतिशय जलद गतीने होणारे बदल आत्मसात करण्यासाठी केलेले ते फार मोठे प्रयत्न होते. भारतीय समाज, युवावर्ग, शेतकरी आणि महिलांच्या आकांक्षांना अधोरेखित करुन त्यांनी सांगितले की त्यांच्या स्वप्नांनी आता अभूतपूर्व उंची गाठली आहे आणि या असामान्य आकांक्षांच्या पूर्तीसाठी असामान्य वेगाची गरज आहे. पंतप्रधानांनी आगामी काळासाठी स्वच्छ ऊर्जा, क्रीडाक्षेत्रात प्रगती, अंतराळ क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी यांसारखी भारताची महत्वाकांक्षी उद्दिष्टे अधोरेखित केली आणि प्रत्येक क्षेत्रात भारताचा ध्वज अत्युच्च फडकत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांवर असलेली प्रचंड मोठी जबाबदारी अधोरेखित करुन हे अतिशय महत्वाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणताही विलंब टाळण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यंदाच्या नागरी सेवा दिनाच्या भारताची सर्वांगीण प्रगती या संकल्पनेविषयी पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ही केवळ एक संकल्पना नाही तर ती वचनबद्धता आणि आणि राष्ट्रातील नागरिकांना दिलेले वाचन आहे, असे ते म्हणाले. कोणतेही गाव, कोणतेही कुटुंब आणि कोणताही नागरिक मागे राहता कामा नये हे सुनिश्चित करणे म्हणजे भारताची सर्वांगीण प्रगती होय, खरी प्रगती ही लहान सहन बदलांबद्दल नाही तर पूर्ण-प्रमाणात परिणाम साध्य करण्याबद्दल आहे, असे त्यांनी सांगितले. सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन विषद करताना त्यांनी सांगितले की यामध्ये प्रत्येक घरासाठी स्वच्छ पाण्याची पूर्तता, प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रत्येक उद्योजकाला वित्तपुरवठा आणि प्रत्येक गावाला डिजिटल अर्थव्यवस्थेचे लाभ मिळणे यांचा समावेश आहे. प्रशासनातील गुणवत्ता केवळ योजना आखण्याने निश्चित होत नाही तर लोकांना किती खोलवर या योजनांचा लाभ होतो आहे आणि त्याचा वास्तविक परिणाम दिसून येतो का यावर अवलंबून आहे, असे ते म्हणाले. राजकोट, गोमती, तिनसुकिया, कोरापुट आणि कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये शाळेतील उपस्थिती वाढण्यापासून ते सौरऊर्जेचा वापर करण्यापर्यंत लक्षणीय प्रगती झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाशी निगडित व्यक्ती आणि जिल्ह्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याची आणि अनेक जिल्ह्यांना मिळालेल्या पुरस्कारांची दखल घेतली.
गेल्या 10 वर्षांत भारताने प्रभावी परिवर्तनाकडे प्रगती करताना केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर यावर भर देऊन, पंतप्रधानां म्हणाले की देशाचे प्रशासन मॉडेल आता पुढील पिढीतील सुधारणांवर केंद्रित आहे, सरकार आणि नागरिकांमधील दरी भरून काढण्यासाठी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर केला जात आहे. या सुधारणांचा परिणाम ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भागांमध्ये दिसून येतो आहे, असे ते म्हणाले. आकांक्षी जिल्ह्यांमधील यशस्वी कामगिरी आणि आकांक्षी तालुक्यांमधील तितक्याच मोठ्या यशोगाथेचा त्यांनी उल्लेख केला. या कार्यक्रमाचा प्रारंभ 2023 मध्ये झाला आणि अवघ्या दोन वर्षात त्याचे अभूतपूर्व परिणाम दिसून आले. या तालुक्यांमध्ये आरोग्य, पोषण, सामाजिक विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा यासारख्या निर्देशांकांमध्ये लक्षणीय प्रगती झाली, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी परिवर्तनात्मक बदलांची उदाहरणे देत सांगितले की राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील पीपलू तालुक्यामध्ये, अंगणवाडी केंद्रांमधील मुलांसाठी मापन कार्यक्षमता 20% वरून 99% पेक्षा जास्त झाली आहे, तर बिहारमधील भागलपूरमधील जगदीशपूर तालुक्यामध्ये, पहिल्या तिमाहीत गर्भवती महिलांची नोंदणी 25% वरून 90% पेक्षा जास्त झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या मारवाह तालुक्यामध्ये संस्थात्मक वितरण 30% वरून 100% पर्यंत वाढले आणि झारखंडच्या गुरडीह तालुक्यामध्ये नळाच्या पाण्याच्या जोडण्या 18% वरून 100% पर्यंत वाढले, असे ते म्हणाले. ही केवळ आकडेवारी नाही तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्याच्या केंद्रसरकारच्या निर्धाराचे प्रतीक आहे. शुद्ध हेतू, नियोजन आणि अंमलबजावणीमुळे दुर्गम भागातही परिवर्तन शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नेहमीच देशभरातील नागरी सेवकांना नागरिकांच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याचे, सार्वजनिक सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आणि त्यांच्या कार्यात सातत्याने उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देत आले आहेत. या वर्षी जिल्ह्यांचा समग्र विकास, महत्त्वाकांक्षी तालुके कार्यक्रम आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये नागरी सेवकांना एकूण 16 पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी