चंद्रपूर, 26 एप्रिल (हिं.स.)।
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या चंद्रपूरच्या सात नागरिकांना अखेर सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. या संपूर्ण प्रयत्नात आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष योगदान राहिले.
चंद्रपूर मधील नागीनाबग वार्ड येथील अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान आणि तेजस्विनी गाडीवान हे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले होते. दहशतवादी हल्ल्याच्या जवळपासच ते थांबलेले होते. माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. सर्व हालचालींनंतर आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने या सात नागरिकांना घरी परत आणण्यासाठी रेल्वेचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आले. शनिवारी दुपारी १२ वाजता हे सर्वजण बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव