अधिवेशनात पारित झाली एकूण 16 विधेयके
नवी दिल्ली, 04 एप्रिल (हिं.स.) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज, शुक्रवारी समारोप झाला. गेल्या 31 जानेवारी रोजी या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या कालावधीत अर्थसंकल्प मांडण्यात येऊन वक्फ दुरुस्तीसह 16 विधेयके मंजूर करण्यात आली. आता राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. यानंतर संसदेचे पावसाळी अधिवेशन होईल.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाच्या 267 व्या सत्राच्या समारोपप्रसंगी सर्व सदस्यांचे सक्रिय योगदान दिल्याबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, या अधिवेशनात राज्यसभेचे एकूण 159 तास कामकाज झाले. सभागृहाची उत्पादकता 119 टक्के होती. अधिवेशनामध्ये, राज्यसभेचे सर्वात जास्त वेळ कामकाज 3 एप्रिल रोजी झाले. यादिवशी सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली, सलग 11 तासानंतर 4 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजून 2 मिनीटांनी कामकाज संपले. राज्यसभेच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ कामकाज झालेला दिवस म्हणून 3 एप्रिल नोंदवला गेला. याशिवाय या अधिवेशनात 49 खाजगी विधेयके सादर करण्यात आली, जो एक नवीन विक्रम असल्याचे राज्यसभा सभापती धनखड म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात म्हणाले की, या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण 26 बैठका झाल्या आणि त्यांची उत्पादकता 118 टक्के होती. या काळात 10 नवीन सरकारी विधेयक मांडण्यात आली आणि 16 विधेयके मंजूर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वक्फ दुरुस्ती विधेयक, 2025 आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, 2024 यांचा समावेश होता.
दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 टप्प्यात पार पडले. पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान चालला, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान चालला. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी