पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराला घाबरून काढला पळ
जम्मू, 30 मे (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 7 महिला जवानांनी पाकिस्तानला घाम फोडल्याचे समोर आले आहे.
प्रत्यक्ष लढाई काळात 3 दिवस आणि 3 रात्र सतत चाललेल्या पाकिस्तानी गोळीबाराला तोंड देत या रणरागिनींनी पाक सैन्याला पळवून लावले. बीएसएफच्या सहायक कमांडंट नेहा भंडारी यांनी या रणरागिणींचे नेतृत्व केले होते.
बीएसएफच्या महिला जवानांना वरिष्ठांकडून मागे हटण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, त्या आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी तो पर्याय नाकारत शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्या पोस्ट्स सोडून अक्षरशः पळ काढावा लागला. या सर्व 7 महिला जवानांची ही पहिलीच प्रत्यक्ष लढाई होती. त्यातील बहुतेक महिला जवान 2 ते 3 वर्षांमध्ये बीएसएफमध्ये भर्ती झाल्या होत्या. पण, त्यांनी ही एक सुवर्णसंधी मानून अत्यंत धैर्याने आपल्या कर्तव्याचे पालन केले. नेहा भंडारी या स्वतः केवळ तीन वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये भर्ती झाल्या होत्या आणि भारताच्या सीमेवर महिलांच्या नेतृत्वात प्रथमच प्रत्यक्ष लढाईसाठी त्यांना संधी मिळाली. त्यांना देशसेवेचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांचे आजोबा भारतीय लष्करात आणि दोघेही पालक सीआरपीएफमध्ये असल्यामुळे देशसेवेसाठी त्यांचे समर्पण वेगळेच होते.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बीएसएफने 76 पाकिस्तानी चौक्या, 42 संरक्षण ठिकाणे, 3 दहशतवादी लाँच पॅड्स, आणि 70 पाकिस्तानी फ्रंट पोस्ट्स उध्वस्त केल्या. या मोहिमेत, नेहा भंडारी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी जवळपास 150 मीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानी पोस्ट्सवरून आलेल्या गोळीबाराचा जोरदार प्रतिकार केला.
यासंदर्भात नेहा भंडारींनी सांगितले की, सीमेवरील 3 पोस्ट्स त्यांच्या नियंत्रणाखाली होत्या. त्यांनी प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. आम्ही त्यांना त्यांच्या चौक्या सोडायला भाग पाडल्याचे नेहा भंडारी म्हणाल्या. या 7 वीरांगनांमध्ये पंजाबच्या मनजीत कौर आणि मलकित कौर या अनुभवी जवानांचा समावेश होता. त्यांनी महत्त्वाची निरीक्षण चौकी आणि बंकर सांभाळले. उर्वरित 4 महिला जवानांमध्ये स्वप्ना राठ व शांपा बासाक (पश्चिम बंगाल), सुमी एक्सेस (झारखंड), आणि ज्योती बनियन (ओडिशा) या नवीन भरती झालेल्या होत्या.
भारतीय सैन्यात महिलांना अजूनही लढाऊ भूमिकांमध्ये पूर्णपणे सामावून घेतलेले नाही, पण बीएसएफच्या या पराक्रमी महिलांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी