नवी दिल्ली, ९ मे (हिं.स.) : भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे बलुच लेखकाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
बलुच लेखक मीर यार बलोच यांनी स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. यासोबतच संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील अनेक शहर आणि परिसरावर आधीच ताबा मिळवला आहे. या भागातील शाळा, महाविद्यालये, सरकारी आस्थापनांवरील पाकिस्तानी झेंडे फेकून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे येथे पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने बलुचिस्तान स्वातंत्र्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करावा. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी. संयुक्त राष्ट्राने सर्व सदस्य देशांची एक बैठक बोलावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर बलुचिस्तानचे नवीन चलन आणि पासपोर्टसाठी सहकार्य करण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे.
बलोच लेख मीर यार बलोच यांनी दहशतवादी पाकिस्तानचे पतन आता जवळ आल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानची फाळणी निश्चित आहे. त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. दिल्लीत बलुचिस्तानचा दुतावास आणि अधिकृत कार्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे.
पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानच्या सर्वच क्षेत्रातून माघार घ्यावी. हा भूभाग सोडावा, हवाई, समुद्र आणि जमिनीवरील सर्व हालचाली थांबवाव्यात. बलुचिस्तानमधून काढता पाय घ्यावा. तर संयुक्त राष्ट्र संघाने त्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे. बलुचिस्तानच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी लवकरच घेण्यात येईल असे मीर यार यांनी स्पष्ट केले. तर या मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधीत्व लक्षणीय असेल, याची त्यांनी हमी दिली. तर मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांना या स्वातंत्र्य सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी