कोल्हापूर, 10 जून, (हिं.स.)।
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतपुरवठा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील खतांच्या उपलब्धता, संभाव्य टंचाई, आवंटन नियोजन आणि वितरण प्रक्रियेतील अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना उत्पादक व विक्रेत्यांनी लिंकिंग विरहित गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठ्याची खबरदारी घ्यावी, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्याअखेर मंजूर आवंटना प्रमाणे १०० टक्के पुरवठा झालेला आहे. जिल्ह्यात सध्या १४ हजार ८६२ मेट्रिक टन युरिया, १ हजार १६३ मेट्रिक टन डीएपी, ६ हजार २१३ मेट्रिक टन एमओपी, २ हजार ६९७ मेट्रिक टन संयुक्त खते, आणि ५ हजार ४४८ मेट्रिक टन एसएसपी उपलब्ध असून, एकूण ५४ हजार ५९९ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. कृषी विभागाने खत उत्पादक कंपन्यांशी समन्वय साधून सर्व खतांचा मुबलक पुरवठा वेळेत आणि सुरळीत होण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत उपस्थित राहून खत वितरण प्रक्रियेत 'लिंकिंग विरहित गुणवत्ता पुरवठ्यासाठी कृषी विभागामार्फत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावर नित्कृष्ठ निविष्ठांवर जिल्ह्यात स्थापन भरारी पथकांमार्फत कडक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
तसेच सर्व निविष्ठा विक्री केंद्रांच्या बाहेर जिल्हा तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल क्रमांक व तक्रार क्यूआर कोड स्पष्टपणे लावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. कोणत्याही तक्रारींसाठी शेतकऱ्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मिश्र खत संघटना पदाधिकाऱ्यांनी डीएपी पुरवठा प्रश्न उपस्थित केला होता. यावर कृषी विभागाने डीएपीचा पुरवठा काही प्रमाणात कमी असून, पर्यायी खतांचा वापर योग्य नियोजनानुसार करण्याचे आवाहन शेतकरी, शेतकरी संघटना आणि खत उत्पादकांना केले आहे.
शेतकऱ्यांनी कोणत्याही कृषि निविष्ठा वितरणातील अडचणींसाठी जिल्हा तक्रार निवारण कक्षाशी ९५२९७७२५२१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने