अमरावती, 10 जून, (हिं.स.) जाती-धर्माच्या राजकारणात न अडकता तसेच हिरवा, भगव्या रंगाच्या भानगडीत न राहता या जगाचा पोशिंदा शेतकरी पहिले जगवा, याच्याच मनगटात एका दाण्याचे हजार दाणे निर्माण करण्याची ताकद आहे. या बळीराजाच्या हक्कासाठी आपण सर्व या अन्नत्याग आंदोलनाच्या खंबीरपणे पाठिशी उभे राहा, असे आवाहन समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांन गुरुकुंज मोझरी येथे केले.
८ जूनपासून प्रहारचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन राष्ट्रसंतांच्या पुण्यभूमी गुरुकुंज आश्रम येथे सुरु आहे. या अन्नत्याग आंदोलनाला सत्यपाल महाराज यांनी भेट देवून कीर्तनाच्या माध्यमातून बळीराजा महती मांडली. सत्यपाल महाराजांनी आपल्या सत्यवाणीतून अन्यायाविरुध्द सप्तखंजेरीचा प्रहार केला. यावेळी लक्ष्मणदास काळे महाराज, रवीदादा मानव, संदीपपाल महाराज गिते, रामपाल महाराज धारकर, पंकजपाल राठोड, वेदांतपाल मुंदाने, विनोद मथुरकर यांच्यासह प्रहार पदाधिकारी, कार्यकर्ता व अमरावतीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी