बीजींग, 11 जून (हिं.स.)।केरळच्या किनार्याजवळ 9 जून रोजी आग लागलेल्या सिंगापूरच्या एमव्ही वान हाय 503 या मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांची यशस्वी सुटका केल्याबद्दल चीनने भारताचे आभार मानले आहेत. तसेच या जहाजावर एकूण 22 कर्मचारी होते, त्यापैकी 14 चीनचे नागरिक होते, अशी माहिती भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी दिली.
भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी एक्सवर म्हटले आहे की, 9 जून रोजी, एमव्ही वान हाय 503 हे जहाज केरळमधील अझिक्कलपासून 44 सागरी मैल दूर असताना जहाजावर स्फोट झाला आणि आग लागली. जहाजावरील एकूण 22 कर्मचाऱ्यांपैकी 14 चीनी नागरिक होते, ज्यात तैवानमधील 6 जणांचा समावेश आहे. भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलाने त्वरित आणि व्यावसायिक बचावकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या घटनेत जहाजावरील 22 कर्मचाऱ्यांपैकी चार जण अद्याप बेपत्ता आहेत, तर पाच जण जखमी झाले असून 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पुढील शोधकार्य यशस्वी होईल आणि जखमी कर्मचारी लवकर बरे होतील अशी आशा चीनने व्यक्त केली आहे.
हे जहाज कोलंबोहून मुंबईजवळील न्हावाशेवा बंदर येथे जात असताना हा स्फोट झाला. कोझिकोडपासून सुमारे 70 सागरी मैल दूर असताना जहाजावरील एका कंटेनरमध्ये स्फोट होऊन मोठी आग लागली. जहाज सध्या भरकटलेल्या अवस्थेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या जहाजावरील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने समुद्रात वाहून गेलेल्या कंटेनर, मोडतोड किंवा व्यक्तींचा मागोवा घेण्यासाठी आपले शोध आणि बचाव सहाय्य साधन कार्यान्वित केले आहे. 'इन्कॉइस'ने संभाव्य तेल गळतीचा इशाराही दिला आहे. तेल गळतीचे नेमके प्रमाण अद्याप समजू शकलेले नाही, तथापि, हवामान अंदाजानुसार 10 जून ते 13 जून या कालावधीत तेल किनाऱ्याच्या समांतर वाहत जाईल आणि यावर सतत देखरेख ठेवली जात आहे. स्थानिक प्रशासनाला किनारी भागातील पाळत वाढवण्याचे आणि संभाव्य सागरी किंवा किनारी धोक्यांसाठी समुदायांना तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode