* भारताविरोधात पुन्हा द्वेष व्यक्त
लंडन , 12 जून (हिं.स.)।बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे वारंवार भारताविरोधातील द्वेष व्यक्त करत आले आहेत. बुधवारी (दि.११) लंडन येथील एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा उल्लेख करत म्हणाले की, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाइन भाषणांवर बंदी घालण्याच्या ढाका सरकारच्या विनंतीकडे पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष केले. युनुस यांचा दावा आहे की, हसीना यांची ही भाषणे बांगलादेशभर संताप उभा करत आहेत.
लंडन येथील चॅथम हाऊस येथे एका कार्यक्रमात बोलताना मोहम्मद युनूस म्हणाले की, मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा मी म्हटलं होतं की, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे तुम्ही भारतात स्वागत करु शकता कारण हा तुमच्या धोरणाच भाग आहे. मी तुम्हाला तुमचे धोरण सोडण्यास भाग पाडू शकत नाही; परंतू शेख हसीना बांगलादेशमधील जनतेबाबत ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यावर प्रतिबंध करावा.
शेख हसीना यांनी भारतात राहून केलेल्या विधानांमुळे बांगलादेशमध्ये असंतोष पसरला. बांगलादेशमध्ये प्रक्षोभक होईल, अशी विधान करण्यापासून त्यांना रोखावे. यासाठी आम्हाला मदत करावी, अशी विनंती पंतप्रधान मोदींना केली होती. परंतु, त्यांनी सोशल मीडियाचा हवाला देऊन नकार दिला. भारतीय पंतप्रधानांनी उत्तर दिले की, 'हे सोशल मीडिया आहे, तुम्ही ते नियंत्रित करू शकत नाही.' यावर 'तुम्ही काय म्हणू शकता? ही एक स्फोटक परिस्थिती आहे, तुम्ही हे सोशल मीडिया आहे असे सांगून या प्रश्नातून स्वत:ची सुटका करु शकत नाही , असेही आपण म्हटलं होतं, असा दावा त्यांनी केला.
पुढे मोहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारला पत्र लिहिले आहे.कायदेशीर कार्यवाही आधीच सुरू आहे, असे सांगत आम्हाला भारतासोबत सर्वोत्तम संबंध निर्माण करायचे आहेत. ते आमचे शेजारी आहेत. आम्हाला त्यांच्यासोबत कोणतीही मूलभूत समस्या नको आहे. परंतु प्रत्येक वेळी गोष्टी चुकीच्या होतात कारण खूप खोटा प्रचार पसरवला जातो, असा दावाही मोहम्मद युनूस यांनी केला.
न्यायाधिकरणाने सुनावणी प्रक्रिया सुरू केली आहे. शेख हसीना यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. अजून बरेच गुन्हे नोंदवणे बाकी आहे. त्यांना सर्व कायदेशीर नोटिसांना उत्तर द्यावे लागेल. आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे अनुसरण करत आहोत. आम्हाला कायदेशीर, पूर्णपणे निष्पक्ष हवे आहे. रागाच्या भरात आम्हाला चुकीची कारवाई करायची नाही, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode