अहमदाबाद, 12 जून (हिं.स.)।अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी टेक ऑफनंतर कोसळल्याची घटना घडली. या विमानात १० केबिन क्रूसह २४२ लोक प्रवास करत होते. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या अपघातावर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची प्रतिक्रिया आली आहे.तसेच ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले की, विमान अपघाताची बातमी ऐकून खूप दुःख झाले. मी भारतीय नागरिकांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये व्यक्त केली.
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. स्टारमर यांनी एका निवेदनात म्हटले की, 'अहमदाबादवरुन ब्रिटिश नागरिकांना घेऊन लंडनला येणाऱ्या विमानाचे दृश्य भयंकर आहे. मी प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहे. या अत्यंत दुःखद काळात माझ्या संवेदना प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.'
मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारचे हे विमान (AI171) दुपारी १ वाजून १० मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे झेपावले होते. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्य असे एकूण २४२ जण होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमान विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात कोसळले. कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे विमान उडवत होते. अपघातावेळी विमानात 242 लोक होते, ज्यात 12 केबिन क्रू सदस्य होते. प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode