मुंबई, 15 जून (हिं.स.)। प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले असून, उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मोहीम सोमवार, १६ जून २०२५ पासून प्रभावीपणे सुरू होईल.
प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत असल्याने, मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक आता रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांच्या समवेत पीक तासांमध्ये सर्व प्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान (End-to-End) तैनात करण्यात येणार आहे. ही टीम प्रत्येक गाडीच्या प्रवासात सर्व डब्यांची सखोल तपासणी करेल.
अनधिकृत प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रवासातच दंड आकारण्यात येईल. दंड भरायला नकार दिल्यास, अशा प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून तेथील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडे सोपवले जाईल व गरज भासल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या मोहिमेचे उद्दिष्ट:
खरे प्रथम श्रेणी प्रवाशांचे हक्क सुरक्षित ठेवणे
उपनगरीय रेल्वे प्रवासातील भाडेप्रामाणिकतेला चालना देणे
सातत्यपूर्ण तपासणीद्वारे अनधिकृत प्रवासास आळा घालणे
ही मोहीम मध्य रेल्वेने यापूर्वी यशस्वीरित्या राबवलेल्या AC लोकल हेल्पलाईन तिकीट तपासणी उपक्रमाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर राबवली जात आहे.
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग सर्व प्रवाशांना विनंती करतो की त्यांनी वैध तिकीट अथवा पास घेऊनच प्रवास करावा आणि तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून सर्वांसाठी प्रवास सुलभ, न्याय्य आ
णि सुरक्षित करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर