ठाणे, 15 जून (हिं.स.)। बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे थांबविण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे मार्फत ‘अतिसार थांबवा’ ही राज्यस्तरीय मोहीम दि. १६ जून ते दि. ३१ जुलै २०२५ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
राज्यभर एकाचवेळी दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे उन्हाळा व पावसाळा या हंगामात नैसर्गिक कारणांनी वाढणाऱ्या अतिसाराच्या संभाव्य घटनांना प्रतिबंध घालणे. यासाठी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ० ते ५ वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण, ओआरएस (ORS) व झिंक गोळ्यांचे वाटप, घरोघरी आरोग्य शिक्षण व समुपदेशन आणि आरोग्य संस्थांमध्ये विशेष कॉर्नरची स्थापना करण्यात येणार आहे.
*महत्त्वाचे तपशील :*
जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २ शहरी प्रा. आ. केंद्रे व १९० उपकेंद्रांमधून ही मोहीम राबविली जाणार.
अंदाजे १,४४,००० बालकांची संख्या असून ११३५ आशा स्वयंसेविका सर्वेक्षणासाठी कार्यरत असतील.
प्रत्येक आशा कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबात जाऊन मुलांचे आरोग्य सर्वेक्षण करणार.
अतिसार आढळल्यास लगेचच ओआरएस व झिंक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार.
सर्व आरोग्य संस्थांमध्ये ‘ओआरएस व झिंक कॉर्नर’ उभारण्यात येणार असून तेथे आवश्यक साहित्य सहज उपलब्ध असेल.
*विशेष लक्ष केंद्रित क्षेत्रे :*
मोहीम राबविताना आरोग्य विभाग अति जोखमीच्या क्षेत्रांवर व दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये प्रमुखतः –
झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी व स्थलांतरित कामगारांचे वस्तीत, बेघर मुले, दूषित पाणीपुरवठा असलेली गावे, मागील दोन वर्षात अतिसाराची साथ झालेली गावे.
*सामाजिक प्रबोधन व शिक्षण :*
ग्राम आरोग्य पोषण दिवसांद्वारे मातांना अतिसार प्रतिबंधक उपाय, स्तनपानाचे महत्त्व, स्वच्छतेचे नियम, ओआरएस व झिंकचे फायदे याबाबत मार्गदर्शन.
प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके घेतली जाणार.
*तांत्रिक मार्गदर्शन व पर्यवेक्षण :*
या संपूर्ण मोहिमेचे तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांच्याकडून करण्यात येणार असून जिल्हास्तरीय देखरेख देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली होईल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
*अतिसार व्यवस्थापन व उपचारासाठी महत्त्वाचे संदेश:*
1. जुलाब ३ किंवा अधिक वेळा झाल्यास :तात्काळ ओआरएसचे द्रावण व इतर द्रवपदार्थ द्यावेत.
2. झिंक गोळ्या: १४ दिवस नियमित द्याव्यात, जरी अतिसार थांबला तरीही.
3. स्तनपान: स्तनपान सुरू ठेवावे व शक्य तितके वारंवार द्यावे.
हात धुणे: स्वयंपाक, जेवण, व बालकाची स्वच्छता यापूर्वी आणि नंतर साबणाने हात धुणे अनिवार्य.
5. ही लक्षणांमध्ये तात्काळ आरोग्य संस्थेचा सल्ला घ्यावा: बालक अधिक आजारी वाटणे, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटाघटा पाणी पिणे, स्तनपान न करणे, शौचात रक्त दिसणे, खूप कमी पाणी पिणे, ताप येणे.
*सल्ल्यासाठी संपर्क:*
जवळच्या आशा स्वयंसेविका किंवा एएनएमशी त्वरित संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर