रत्नागिरी : सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत - जिल्हाधिकारी
रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडित असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांना आजच बोलावून घेऊन तातडीने निकालात काढावेत. तक्रार घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना क
लोकशाही दिन


रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडित असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांना आजच बोलावून घेऊन तातडीने निकालात काढावेत. तक्रार घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना क्षेत्रीय स्तरावरच संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारी सोडवून न्याय द्यायला हवा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रलंबित अर्जांचा सर्वप्रथम आढावा घेतला. फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असणाऱ्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथील साक्षी संतोष नाटेकर यांच्या अर्जावर ते म्हणाले, जिल्हा परिषद ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ही समस्या तातडीने सोडवायला हवी होती. आजच श्रीमती नाटेकर यांना कार्यालयात बोलावून संबंधित अधिकाऱ्यांनी ही समस्या तातडीने निकालात काढावी, अशी सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांना दिली.

अन्य तक्रार अर्जांबाबत संबंधित अधिकारी, गटविकास अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढच्या लोकशाही दिनापासून संबंधित तक्रार अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेऊन सोबत यावे, असेही ते म्हणाले. तक्रार घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना क्षेत्रीय स्तरावरच संबंधित अधिकाऱ्यांनी न्याय द्यायला हवा. त्यांना जिल्हास्तरावर यायला लागू नये. याची दक्षता सर्वांनीच घ्यायला हवी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे आदींसह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी, तहसीलदार दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande