मुंबई इंडियन्सचा पराभव करत पंजाबला फायनलमध्ये नेत कर्णधार श्रेयस अय्यरने रचला इतिहास
अहमदाबाद , 2 जून (हिं.स.)।आयपीएलच्या १८ व्या हंगामातील क्वालिफायर २ मध्ये श्रेयस अय्यरनं कॅप्टन्सीला साजेसा खेळ करत २०० पारची लढाई जिंकून पंजाब किंग्जच्या संघाला फायनलमध्ये नेले आहे. पंजाब किंग्जच्या विजयासह तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांना फायनलमध्य
Shreys ayyar


अहमदाबाद , 2 जून (हिं.स.)।आयपीएलच्या १८ व्या हंगामातील क्वालिफायर २ मध्ये श्रेयस अय्यरनं कॅप्टन्सीला साजेसा खेळ करत २०० पारची लढाई जिंकून पंजाब किंग्जच्या संघाला फायनलमध्ये नेले आहे. पंजाब किंग्जच्या विजयासह तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांना फायनलमध्ये नेण्याचा खास विक्रम अय्यर नावे झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात अन्य कुणालाही अशी कामगिरी जमलेली नाही.

गत हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ चॅम्पियन ठरला होता. त्याआधी श्रेयस अय्यरनं दिल्ली कॅपिटल्सच्या संघालाही फायनलमध्ये नेले होते. आता पंजाब किंग्जच्या संघाने त्याच्या नेतृत्वाखाली फायनल गाठली आहे. आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांना फायनलमध्ये नेणारा तो पहिला कर्णधार ठरलाय.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या क्वालिफायर २ च्या लढतीत श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा ८(७) आणि बेअरस्टो ३८ (२७) धावा करून माघारी फिरल्यावर तिलक वर्मानं २९ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनं २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या १३ चेंडूत १५ धावा करून परतल्यावर नमन धीर याने १८ चेंडूत केलेल्या १८ चेंडूतील ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या साने निर्धारित २० षटकात ६ बाद २०३ धावा करत पंजाबसमोर २०४ धावांचे टार्गेट सेट केले होते.

मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगच्या रुपात पंजाबने पहिली विकेट स्वस्तात गमावली. पावरप्लेमध्येच प्रियांश आर्यही तंबूत परतला. त्यानंतर जॉश इंग्लिसने आपला तोरा दाखवला. त्याने मुंबई इंडियन्सचाच नव्हे तर जगात भारी असलेल्या जसप्रीत बुमराहच्या एका षटकात २० धावा कुटल्या अन् पंजाबचा आत्मविश्वास वाढला. हार्दिक पांड्याने विकेट घेण्याआधी तो २१ चेंडूत ३८ धावा करून परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचत सामना पंजाबच्या बाजूनं सेट केला. नेहल वढेरानं २९ चेंडूत ४८ धावांची दमदार खेळी केली. श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत खेळत ४१ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने नाबाद ८७ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवला.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात २०० धावा केल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघाने कधीच सामना गमावला नव्हता. पण जॉश इंग्लिसनं तोऱ्यात केलेली बॅटिंग आणि श्रेयस अय्यरनं शेवटपर्यंत खेळत दाखवलेला क्लास खेळीसमोर मुंबई इंडियन्सचा रुबाब फिका ठरला. या सामन्यातील विजयासह पंजाब किंग्जचा फायनलमधील प्रवेश पक्का होताच यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये नवा चॅम्पियन मिळणार हे पक्के झाले आहे.

याआधी क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जच्या संघाला नमवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने थेट फायनल गाठली होती. आता पंजाब किंग्ज पुन्हा त्यांच्यासोबत विजेतेपदासाठी भिडताना दिसेल. मागील १७ हंगामात दोन्ही पैकी एकाही संघाने अद्याप ट्रॉफी जिंकलेली नाही. पंजाब किंग्जचा संघ २०१४ नंतर पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. ३ जूनला या दोन संघातील कोणता संघ फायनल बाजी मारून ट्रॉफीचं स्वप्न साकार करणार ते पाहण्याजोगे असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande