नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स. ) :
भारतीय
बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप
यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सायना आणि कश्यप यांनी १४
डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले होते. आता सात वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा
निर्णय घेतलाय. सायनाने कश्यपपासून वेगळे होण्याचा निर्णय सोशल मीडियाच्या
माध्यमातून जाहीर केला आहे.
कश्यपपासून
वेगळे होण्याची घोषणा करताना सायना नेहवालने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये
लिहिले की, 'आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या
दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली
कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.'सायनाने पुढे लिहिले की, 'आपण स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि चांगले आरोग्य निवडत आहोत.'
सायना
नेहवालने २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तीन वेळा
ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेली सायना ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय
बॅडमिंटनपटू ठरली होती. २०१० आणि २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
विजेती सायनाचा पती पारुपल्ली कश्यप देखील एक दिग्गज बॅडमिंटनपटू आहे. पारुपल्ली
कश्यपने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय इतर अनेक
प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये तो विजेता राहिला आहे. माजी ऑल-इंग्लंड चॅम्पियन प्रकाश
पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले. तर सायना
नेहवाल बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी एकमेव महिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरली
होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra