अमरावती, 14 जुलै (हिं.स.)
परमिट बार चालकांच्या संदर्भात सरकाकडून लादण्यात येत असलेल्या मोठ्या प्रमाणातील कर व शुल्कामुळे बार व्यवसाय अडचणीत आला आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज १४ जुलै रोजी अमरावतीसह संपुर्ण विदर्भातील बार सरकारच्या धोरणाविरोधात बंद पुकारण्यात आला. अमरावती मध्ये ही बार संचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
संपूर्ण महाराष्ट्रात एकंदर २०,००० च्या आसपास बार आहेत. वेटर, कुक इत्यादी कर्मचारी असे सात लक्ष तसेच किराणा, भाजीपाला, मटण, डेरी प्रॉडक्ट व इतर सप्लाय करणारे आणखी सहा लाख कुटुंब या व्यवसायावर आपले पोट भरत आहे. हजारो कोटी रुपयांचा महसूल बारचालक सरकारला देतात.काही वर्षापासून या व्यवसायाला सरकारच्या धोरणांमुळे भयंकर मोठा फटका बसत आला आहे. यावर्षी अमरावतीमध्ये २४ तर इतर सर्व ठिकाणी मिळून ११०० बार बंद झाले. फक्त बार चालकांवरच लादलेला १०% व्हॅट, यावर्षी केलेली १५% फी वाढ, आणि त्यावर कहर म्हणून आता ५०% मद्यावरील वाढवलेला जुलमी कर यामुळे या व्यवसायाचे कंबरडे पूर्णपणे तुटणार आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन बैठका अमरावती असोसिएशननी केल्या. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. मात्र, त्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. सरकारने आमचे म्हणणे ऐकून घ्यावे व हा अतिशय संकटात आलेला व्यवसाय सुधरावा यासाठी योग्य निर्णय घ्यावे अशी विनंती सर्व महाराष्ट्रातील असोसिएशन तर्फे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला आज मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला.
इर्विन चौक ते कलेक्टर ऑफिस असा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील सर्व बार व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी