अकोला, 3 जुलै (हिं.स.)।भारत हा जगातील सर्वाधिक युवक असलेला देश आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यादृष्टीने पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवतेचे तत्त्वज्ञान सर्वदूर पोहोचविण्यासाठी कौशल्य विकास विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. तो समन्वयाने यशस्वी करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे केले.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन विचारांना ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या वतीने आयोजित हिरक महोत्सवात जिल्हास्तरीय एकात्म मानव दर्शन समितीची सभा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी झाली.
कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे राज्यभरात जिल्हा समित्यांच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय, खाजगी व आदिवासी शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
पं. उपाध्याय यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक प्रकाशन, तसेच निबंध, वकृत्व, चित्रकला, वादविवाद स्पर्धा व एकपात्री प्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होण्यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सभेला प्रकल्प अधिकारी मोहनकुमार आवारे, समाजकल्याण सहायक आयुक्त एम. जी. वाठ, माध्यमिक शिक्षणाधिकारी अरविंद मोहिरे, रतनसिंह पवार, नागेश देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, एस. एन. साळुंखे व विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे