अलिबाग, 30 जुलै (हिं.स.)। ग्रामविकासात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांना पंचायतराज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्यातर्फे ग्रामरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार गावाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या संपूर्ण ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत टीमच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. “हा पुरस्कार माझ्या नागाव गावातील प्रत्येक ग्रामस्थाला समर्पित आहे. आपल प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद हेच माझं खऱ्या अर्थाने बळ आहे.” या यशाचे श्रेय आपल्या ग्रामपंचायत टीमला, सर्व सन्माननीय सदस्यांना, ग्रामविकास अधिकारी आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांना दिले. “तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं,” असे प्रतिपादन त्यांनी केलं तसेच खास उल्लेख करत त्यांनी आपल्या पती निखिल मयेकर यांचे आभार मानले. “तुमचं आधार, समजून घेणं आणि सततचा पाठिंबा हेच माझ्या वाटचालीचे खरे शक्तिस्थान आहे,” पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल अखिल भारतीय सरपंच परिषद आणि किरण भगत यांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “हा सन्मान ग्रामीण भागातील सेवा कार्यासाठीची माझी बांधिलकी अधिक दृढ करतो,” असेही त्यांनी नमूद केले. सरपंच हर्षदा मयेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला बद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant