माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, दिवंगत माजी खासदार तुळशीदासदादा जाधव यांच्या कन्या, व माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ यांचे आज, मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव मुरारजी पेठ येथी
nirmal


सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, दिवंगत माजी खासदार तुळशीदासदादा जाधव यांच्या कन्या, व माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ यांचे आज, मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव मुरारजी पेठ येथील तोरणा बंगला येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पुणे रोड, बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ॲड. विपीन व सचिन ही दोन मुले, डॉ. सुनिता व शिल्पा या सुना व नातवंडे असा परिवार आहे.

निर्मलाताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कामगिरी बजावली होती. त्यांचा सहज-सरळ स्वभाव, लोकाभिमुख कार्यपद्धती व महिलांच्या प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांचा जनसामान्यांत प्रभाव होता. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सन २००६ साली सोलापुरात झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या कार्याध्यक्ष होत्या. हे संमेलन सोलापुरात भरविण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता. अनेकांचा विरोध झुगारून त्यांनी हे संमेलन यशस्वी करून दाखवते. त्यावेळी त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते. त्यांनी विधानसभा व विधान परिषदेतही काम पाहिले आहे. माजी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या निर्मलाताई ठोकळ यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि खासदार स्व. तुळशीदास दादा जाधव यांच्या निर्मलाताई ठोकळ या कन्या. सोलापूर महानगरपालिकेत १९६२ ते १९६७ आणि १९६९ ते १९७४ अशा दोन टर्म त्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक होत्या. १९७२ ते १९७८ या कालावधीत त्यांची विधानसभेवर निवड झाली तर १९८२ ते १९८८ या कालावधीत त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य होत्या. विधान परिषदेच्या आश्वासन समितीचे प्रमुख म्हणून तसेच पंचायत राज व अन्य समित्यांवर देखील त्यांनी काम केले. सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या .महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संस्थापक संचालक म्हणून त्यांनी १९७५ ते १९८४ या कालावधीत काम पाहिले. १९६८ पासून ते दीर्घकाळ इंदिरा महिला जीवन विकास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या त्या चेअरमन होत्या. महिला प्रबोधिनी या मासिकाच्या संस्थापक संपादक म्हणून त्या कार्यरत होत्या. १९९२ ते १९९८ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील त्या संचालक राहिल्या आहेत. २००४ ते २००६ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या उपाध्यक्ष होत्या.

. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande