छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
पैठण मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे नुकसान, बांधावरची माती वाहून जाणे, घरांचे व पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची माहिती देण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा मांडत बाधित शेतकरी कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी त्यांना निवेदन दिले.
शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय व योग्य ती मदत मिळावी, पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मिळावी आणि शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा द्यावा अशी मागणी केली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis