ठाणे, 28 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महसूल आणि वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर येण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना
या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक आणि पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, पावसाळ्यात झाडाखाली थांबणे टाळावे, तसेच नदी आणि नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा सूचना शासन आणि प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.
प्रशासकीय तयारी
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सर्व जिल्ह्यांमधील नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात आले आहेत. जुन्या आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. वीज आणि रस्ते दुरुस्तीसाठी पथके, साखळी आरे आणि फीडर संरक्षण युनिट्स तैनात ठेवण्यात आले आहेत. कोकण आणि वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणांचा दररोज आढावा घेण्यात येत आहे.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक
संभाव्य पूर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
* ठाणे: ९३७२३३८८२७
* रायगड: ८२७५१५२३६३
* मुंबई शहर आणि उपनगर:
१९१६/०२२-६९४०३३४४
* रत्नागिरी: ७०५७२२२३३
* पालघर: ०२५२५-२९७४७४
* सिंधुदुर्ग: ०२३६२-२२८८४७
* धाराशिव: ०२४७२-२२७३०१
* सोलापूर: ०२१७-२७३१०१२
* बीड: ०२४४२-२९९२९९
* अहिल्यानगर: ०२४१-२३२३८४४
* परभणी: ०२४५२-२२६४००
* नांदेड: ०२४६२-२३५०७७
* लातूर: ०२३८२-२२०२०४
* पुणे: ९३७०९६००६१
* सातारा: ०२१६२-२३२३४९
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC), मंत्रालय, मुंबई येथील अधिकारी २४x७ उपलब्ध असून त्यांचे दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:
* ०२२-२२०२७९९०
* ०२२-२२७९४२२९
* ०२२-२२०२३०३९
* ९३२१५८७१४३
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC) परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली जाईल, असेही शासनाने कळविले आहे.
तरी या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जावू नये, प्रशासन आणि सर्व यंत्रणा त्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर