
अमरावती, 06 जानेवारी (हिं.स.)। रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातील कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मंगळवारी अत्यंत तीव्र वळणावर पोहोचले. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट रतन इंडियाची रेल्वे रोखून धरत प्रकल्पाचे चारही प्रवेशद्वार बंद केले.पोलिसांचा चारही प्रवेशद्वारावर तगडा बंदोबस्त असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा रतन इंडिया व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा न केल्यामुळे आंदोलन कोणत्याही क्षणी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उपोषणाचे नेतृत्व करणारे भाजप नेते विवेक गुल्हाने यांची प्रकृती आंदोलनादरम्यान खालावली. सातत्याने सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा, चक्कर येणे आदी त्रास जाणवू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप अधिकच वाढला. “कामगारांच्या हक्कांसाठी आम्ही माघार घेणार नाही,” असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, आंदोलनस्थळी आ. राजेश वानखडे यांनी भेट देत उपोषणकर्त्यांना धीर दिला.त्यांनी रतन इंडिया व्यवस्थापनाच्या बेजबाबदार आणि कामगार विरोधी भूमिकेचा समाचार घेतला.विवेक गुल्हाने यांनी कामगारांच्या हक्कासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत त्यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत रतन इंडियाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा भाजप अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशाराही आ. राजेश वानखडे यांनी दिला.
रतन इंडियाच्या एका शिष्टमंडळाने आ. राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत विवेक गुल्हाने व अन्य उपोषणकर्त्यांची भेट घेतली व आंदोलन मागे घेण्याबाबत विंनंती केली मात्र प्रकल्पप्रमुख यांनी लेखी आश्वासन देण्यावर उपोषणकर्ते ठाम राहले त्यामुळे आजची चर्चा निष्फळ ठरली असून आज सकाळपासून आ. राजेश वानखडे हे उपोषण मंडपात तळ ठोकून बसले होते.या आंदोलनाला परिसरातील वाघोली व डवरगाव येथील त्रस्त नागरिकांनीही पाठिंबा दर्शवत उपोषणस्थळी उपस्थिती लावली. स्थानिक नागरिकांच्या मते, प्रकल्पामुळे रोजगाराच्या नावाखाली आमच्या मुलांना अन्याय सहन करावा लागत असून दुसरीकडे वाघोली गावात रतन इंडियाच्या उडणाऱ्या राखेमुळे नागरिकांचे जीवन हैराण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास आंदोलन अधिक उग्र रूप धारण करू शकते, असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत आहे.कामगारांच्या हक्कांसाठी पेटलेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला असून, रतन इंडिया प्रशासन व शासनाची पुढील भूमिका काय असते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी