
पुणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। वाहतूक नियमभंग करूनही ई-चलनचा दंड न भरलेल्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना नोटीस पाठविण्यात येणार असून, ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास चालक परवाना निलंबन किंवा न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील अनेक वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतरही ई-चलानचा दंड प्रलंबित ठेवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांना दंड भरण्याबाबत अधिकृत नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दंड न भरलेल्या वाहनमालकांना अधिकृत नोटीस देण्यात येणार आहे.नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरावी. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु