
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। चेंबूर परिसरातील सुभाष नगर भागात शनिवारी सकाळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर भीषण अपघात घडला. सहाव्या मजल्यावर काम करत असताना सहा कामगार अचानक तोल जाऊन सुमारे ८० ते ९० फूट उंचीवरून खाली कोसळले. या दुर्घटनेत एका ५५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला असून इतर 5 जणांवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष नगर येथील एका उच्चभ्रू इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू होते. शनिवारी सकाळी कामगार सहाव्या मजल्यावर विटांचे तसेच स्लॅबचे काम करत होते. याच दरम्यान अचानक तोल गेल्याने सर्वजण खाली पडले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी कामगारांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय येथे हलवले.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, रामल्लू (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुणधर राय (वय २२) यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. उसराय (वय ३०), रमेश राय (वय २५), विजय (वय २५) आणि संदीप (वय २७) यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कामगारांनी सुरक्षेची साधने वापरलेली नव्हती. सहाव्या मजल्यावर काम करत असतानाही हेल्मेट, सेफ्टी बेल्ट किंवा संरक्षणात्मक जाळीचा वापर झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे बांधकामस्थळी सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule