
सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांकडे यंदाच्या गाळप हंगामात त्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची फेब्रुवारीअखेर देय असलेली सुमारे ११०७ कोटी रुपयांची ऊसबिले थकली आहेत. जिल्ह्यातील हंगाम बऱ्यापैकी आटोपला असला तरीही ऊसबिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.यंदाचा गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील ३४ पैकी पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब या तीन साखर कारखान्यांनीच शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसार ऊसबिले दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. उर्वरित ३१ कारखाने पहिल्या हप्त्यानुसार ऊसबिले देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते. गाळप झालेल्या उसाचे पेमेंट १४ दिवसांत शेतकऱ्यांना अदा करणे साखर कारखान्यांसाठी कायद्याने बंधनकारक आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात एक कोटी ५४ लाख १२ हजार ४११ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना तीन हजार ४७६ कोटी रुपयांची ऊसबिले देण्यात आली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड