
नवी दिल्ली, 11 मार्च (हिं.स.)आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९ व्या हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. जगातील सर्वात लोकप्रिय टी२० फ्रँचायझी लीगचा हा हंगाम २८ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला टप्पा १२ एप्रिलपर्यंत खेळवला जाणार आहे.
स्पर्धेचा पहिला सामना २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ (आरसीबी) सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्ध खेळेल. आरसीबीने २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. उद्घाटन सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण २० सामने खेळवले जातील. हे सामने १० वेगवेगळ्या शहरांमध्ये होतील. यामध्ये बेंगळुरू, मुंबई, गुवाहाटी, न्यू चंदीगड, लखनऊ, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. या काळात चार डबल-हेडर मुकाबले होणार आहेत. डबल-हेडर दरम्यान, एकाच दिवशी दोन सामने खेळवले जातील. दुपारचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांचे पाच होम मॅचेस बंगळुरूमध्ये आणि दोन रायपूरमध्ये खेळेल. पंजाब किंग्ज त्यांचे चार होम मॅचेस न्यू चंदीगडमध्ये आणि तीन धर्मशालामध्ये खेळतील. राजस्थान रॉयल्स त्यांचे तीन होम मॅचेस गुवाहाटीत आणि चार जयपूरमध्ये खेळतील.
आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका नियोजित आहेत, म्हणूनच बीसीसीआयने केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका नियोजित आहेत त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि चेन्नई (तामिळनाडू) हे अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राउंड आहेत, तर गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड आहे. उर्वरित आयपीएल सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक या राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जाहीर केले जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होेते. यावेळी आरसीबी त्यांचे विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. सध्या बंगळुरूमधील सामने राज्य सरकारच्या तज्ञ समितीच्या मान्यतेवर अवलंबून असतील. कर्नाटक सरकारने स्थापन केलेली तज्ञ समिती १३ मार्च २०२६ रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमची पाहणी करेल. या काळात, सामन्याच्या तयारीचा संपूर्ण मॉक डेमो आयोजित केला जाईल, त्यानंतर स्टेडियम आयपीएल सामने आयोजित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे की नाही हे निश्चित केले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे