इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी
तेहरान , 16 मार्च (हिं.स.)। इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार तातडीने सक्रिय झाली होती. सरकारने माहिती दिली की आखाती प्रदेशातून आतापर्यंत सुमारे २०,००० भारतीय नागरिक भारतात पर
इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी


तेहरान , 16 मार्च (हिं.स.)। इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार तातडीने सक्रिय झाली होती. सरकारने माहिती दिली की आखाती प्रदेशातून आतापर्यंत सुमारे २०,००० भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने यापूर्वी भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली होती, ज्यामध्ये दूतावासाला माहिती न देता इराणची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगण्यात आले होते. आता दूतावासाने पुन्हा एकदा अशीच सूचना जारी केली आहे.

भारतीय दूतावासाने सांगितले आहे की सर्व भारतीय नागरिकांनी तेहरानस्थित भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय इराणमधील कोणतीही भूप्रदेशीय (जमिनीवरील) सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.दूतावास सातत्याने भारतीय समुदायाच्या संपर्कात असून जिथे गरज आहे तिथे मदतीची व्यवस्था केली जात आहे. पूर्वसूचना किंवा समन्वयाशिवाय सीमेकडे जाणे धोकादायक ठरू शकते. जे नागरिक दूतावासाला न कळवता जमिनीमार्गे इराण सोडण्याचा प्रयत्न करतील, त्यांना राहण्याची, अन्नाची तसेच इमिग्रेशनसंबंधित गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लक्षात घ्या की इराणची सीमा पार केल्यानंतर दूतावासाकडून मदत मिळू शकणार नाही.

इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी केवळ दूतावासाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा आणि कोणताही प्रवास सुरू करण्यापूर्वी दूतावासाशी नक्की संपर्क साधावा. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत खालील हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल: +९८ ९१२ ८१० ९११५, +९८ ९१२ ८१० ९१०२, +९८ ९१२ ८१० ९१०९, +९८ ९९३ २१७ ९३५९ , दूतावासाने ईमेल आयडीही जारी केला आहे: cons.tehran@mea.gov.in

सरकारने सांगितले की इराणमध्ये राहणारे ५५० हून अधिक भारतीय नागरिक जमिनीमार्गे आर्मेनियामध्ये पोहोचले आहेत. तसेच सुमारे ९० भारतीय नागरिक इराणमधून जमिनीमार्गे अझरबैजानमध्येही पोहोचले आहेत. या स्थलांतराची संपूर्ण व्यवस्था तेहरानस्थित भारतीय दूतावासाने केली होती. दूतावासाने नागरिकांना व्हिसा आणि आवश्यक इमिग्रेशन प्रक्रियेमध्येही मदत केली.

आर्मेनियात पोहोचलेल्या ५५० नागरिकांपैकी २८४ जण धार्मिक यात्रेसाठी इराणमध्ये गेले होते. सध्या हे सर्व नागरिक या दोन्ही देशांमध्ये सुरक्षित आहेत. त्यापैकी काही जण भारतात परतले असून उर्वरित नागरिक पुढील काही दिवसांत परतण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थिती असूनही तेहरानस्थित भारतीय दूतावास पूर्णपणे कार्यरत आहे. अलीकडील काळात तेहरानबाहेर असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित शहरांमध्ये हलवण्यासाठीही दूतावासाने मदत केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande