
रायगड, 16 मार्च (हिं.स.)।: सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घडामोडी आणि जनहिताच्या विषयांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार – २०२५’ मध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील पत्रकार संदेश जयवंत साळुंके यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासन आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या १५ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला असून त्यामध्ये रायगड जिल्ह्यातून हिंदुस्थान समाचारचे नेरळ येथील रायगड जिल्हा प्रतिनिधी संदेश साळुंके यांची निवड करण्यात आली.या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते संदेश साळुंके यांना राज्यस्तरीय ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार 2025’ प्रदान करून गौरविण्यात आले.
संदेश साळुंके यांनी पत्रकारिता करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजातील विविध प्रश्न, विकासकामे, तसेच जनतेच्या हिताचे विषय सातत्याने मांडले आहेत. व्यवसाय आणि पत्रकारिता यांची योग्य सांगड घालत समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.या सन्मानामुळे रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून संदेश साळुंके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)