
नाशिक, 20 मार्च (हिं.स.) : जीवनात कुठलाही भोग नसावा असा राजा असावा, तसेच राजाचे चरित्र व चारित्र्य निर्विवाद व निष्कलंक असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी केले.
हे मत त्यांनी श्रीकाळाराम संस्थानच्या वतीने आयोजित श्रीकाळाराम वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ च्या व्याख्यानमालेत ‘रामराज्य आदर्श शासन’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानात व्यक्त केले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले की, रामराज्य काळातील शासन व्यवस्था समाजाला प्रशिक्षित करणारी व संस्कारित करणारी मंदिरे होती. समाजाला सुसंस्कृत बनविण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून त्यात नैतिकतेला प्राधान्य दिले पाहिजे. वाल्मिकी रामायणात रामाची स्तुती नाही; तरीही भारत आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक मानवतेची भूमी आहे. राजाने उभी केलेली यंत्रणा म्हणजे अधिकारी आणि सरकार चालविणारी यंत्रणा म्हणजे शासन व्यवस्था होय.
त्यांनी अधोरेखित केले की, आदर्श नागरिक घडवण्यासाठी राजा कारणीभूत असतो. समाजाची सुरुवात कुटुंब व्यवस्थेपासून होते, जिथे नैतिक मूल्ये पाळली जातात. भ्रष्टाचार आणि सामाजिक समस्यांचा निराकरण करताना स्त्री शक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असेही त्यांनी सांगितले.
व्याख्यानाचे प्रास्ताविक मिलिंद तारे यांनी केले, तर स्वागत शुभम मंत्री यांनी केले. यावेळी श्री शांताराम अवसरे, एडवोकेट अक्षय कलंत्री आणि अमित कोठावदे विश्वस्त उपस्थित होते.------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV