मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रात अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राची निवड भारत सरकारच्या नीती आयोग अंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशनच्या अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर योजनेसाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २.५ कोटी रुपयांचे अनुदान मंजू
मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रात अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर


रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राची निवड भारत सरकारच्या नीती आयोग अंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशनच्या अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर योजनेसाठी करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी २.५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. ग्रामीण व निमशहरी भागात नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कोकणातील युवक, शेतकरी, मत्स्यव्यवसायिक आणि स्थानिक उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली स्टार्टअप परिसंस्था आता गावपातळीवर पोहोचविण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणाला स्वयंपूर्ण उद्योजक केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे. स्थानिक पातळीवरील फळप्रक्रिया, कचरा, सागरी वाहतूक यांचे रूपांतर व्यावसायिक संधींमध्ये करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे आत्मनिर्भर कोकण साकारण्यास चालना मिळेल. रत्नागिरी उपपरिसरात सुमारे ४,००० चौरस फूट जागेत अत्याधुनिक फॅब लॅबसह इन्क्युबेशन सुविधा उभारण्यात येणार आहेत. स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रोटोटायपिंग, तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील तज्ज्ञ व उद्योग क्षेत्राशी थेट जोडणीही साधली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर किनारपट्टी लाभली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ब्ल्यू इकॉनॉमीसाठी मोठी क्षमता असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टियर-३ शहरात हा उपक्रम राबविणे म्हणजे शहरी-ग्रामीण नवोपक्रम दरी कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला चालना देणारे पाऊल ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून समाजातील विविध घटकांना लाभ देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, महिला बचत गटांसाठी ब्रँडिंग व मार्केटिंग सहाय्य, तसेच युवकांसाठी थ्री-डी प्रिंटर, लेझर कटर, सीएनसी यंत्रसामग्रीसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर उपलब्ध होणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरातील हा उपक्रम कोकणातील नवोपक्रम, कौशल्यविकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल. ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ हे कोकणातील युवकांसाठी स्वप्नांना उभारी देणारे व्यासपीठ ठरणार असून पुढील पाच वर्षांत ६० पेक्षा अधिक स्टार्टअप्सना चालना देऊन हजारो रोजगारनिर्मितीचे लक्ष बाळगून कोकणाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. स्थानिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आत्मनिर्भर कोकण घडविण्यास हा उपक्रम सहाय्यभूत ठरेल, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande