
मुंबई, 24 मार्च (हिं.स.)। : अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव बायपास रोडवर टँकरमधून गॅसची चोरी करून अनधिकृत साठा करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. आमदार संजय पोतनीस यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम राबवण्यात आली. संबंधित टँकर पुण्यातून–छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, वाहतुकीदरम्यान काही टँकर चालक गॅसची जाणीवपूर्वक गळती करून त्याची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. हा चोरी केलेला गॅस काही ठिकाणी थांबून अनधिकृतरित्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवहार सुरू होते, त्या सर्व ठिकाणांवर छापे टाकून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, या प्रकरणात केंद्र सरकारचा अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला असून, त्याअंतर्गत कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. गरज भासल्यास हा कायदा आणखी कडक करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. अलीकडेच पुण्यात तीन टँकर पकडण्यात आले आहेत, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून नियमित कारवाई सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर