ठाण्याचा ऐतिहासिक वारसा तरुणांनी जपावा - आ. केळकर
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा ठाणे, 27 मार्च (हिं.स.) : पोर्तुगीजांच्या क्रूर सत्तेच्या जोखडातून मराठ्यांनी २७ मार्च १७३७ रोजी ठाणे किल्ला म्हणजे आताचे ठाणे कारागृह मुक्त केले. या घटनेस २८९ वर्षे पूर्ण झाली. ठाण्याचा हा
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा


सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा

ठाणे, 27 मार्च (हिं.स.) : पोर्तुगीजांच्या क्रूर सत्तेच्या जोखडातून मराठ्यांनी २७ मार्च १७३७ रोजी ठाणे किल्ला म्हणजे आताचे ठाणे कारागृह मुक्त केले. या घटनेस २८९ वर्षे पूर्ण झाली. ठाण्याचा हा ऐतिहासिक वारसा ठाणे शहरातील तरुणांनी जपावा यासाठी गेली १२ वर्षे ठाणे मुक्ती दिन साजरा केला जात असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार २७ मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. केळकर म्हणाले, ठाण्यात पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार करून सत्ता राबवली. येथील नागरिकांना ठाणे किल्ल्यात डांबले. २७ मार्च १७३७ रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून हा किल्ला मुक्त केला. पुढे इंग्रजांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना या किल्ल्यात डांबले. अनेकांना फाशी दिले. त्यामुळे हा केवळ किल्ला किंवा आताचे कारागृह नसून तो ठाण्याच्या जाज्वल्य इतिहासाचा वारसा आहे. हा वारसा जपण्याचे काम ठाण्यातील समस्त तरुण मंडळींनी करायला हवे. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आम्ही गेली १२ वर्षे ठाणे मुक्ती दिन साजरा करत आहोत. कारागृहात स्वातंत्र्यसैनिक आणि शाहिदांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास उलगडण्याचे काम हाती घेतले असल्याचीही माहिती श्री.केळकर यांनी दिली. श्रमिकभाऊ हे महाराष्ट्राचे दुर्गरत्न असून राज्य सरकारने दुर्गरत्न पुरस्कार जाहीर केला तर तो त्यांनाच मिळेल, असा विश्वासही श्री.केळकर यांनी व्यक्त केला.

श्रमिक गोजमगुंडे म्हणाले, ठाणे कारागृह हे ऐतिहासिक ठिकाण असून शहराला ऐतिहासिक वारसा आहे. सहयाद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिन साजरा होतो याचा अभिमान आहे. शिवभक्त आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड-किल्ल्यांवर विविध कामे सुरु आहेत. ठाण्यात पिंपळोस किल्ल्याचे काम आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होणार आहे. ठाणे कारागृहातील तोफांनाही नवसंजीवनी दिली असल्याचे श्री. गोजमगुंडे यांनी सांगितले.

यावेळी कारागृह अधीक्षक राणी भोसले, श्री. भोसले, उप अधीक्षक श्री. भवर, श्री. कापडे, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका उषा वाघ, किशोर मसुरकर, राजेश गाडे, अरिफ बडगुजर, विशाल वाघ, सह्याद्री प्रतिष्ठानच्या स्वप्नाली साळवी, मत्सगंधा पवार, गणेश मांगले व प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर उपस्थित होते.

*कारागृह हलवण्यास ठाणेकरांचा विरोध*

कारागृहाच्या ठराविक अंतरापर्यंत इमारती उभ्या करता येत नसल्याने हे कारागृहच हलवण्याचा डाव बिल्डर लॉबीने रचला आहे. ठाणे कारागृहात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचे काम सुरू असून म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास जपण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरसाठी निधीही देण्यात आला असून टेंडरही तयार आहे. मात्र अचानक हे काम थांबवण्यात आले आहे. हे कारागृह हलवण्याचा घाट घालण्यात आला आहे का? असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उपस्थित करुन ठाणेकरांचा या स्थलांतराला ठाम विरोध असल्याचेही श्री.केळकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande