
नवी दिल्ली , 14 एप्रिल (हिं.स.)।भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. यासोबतच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे तसेच इतर खासदारांनी संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा स्थळ येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, “भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. बाबासाहेब हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, गहन विचारवंत, विधिज्ञ आणि समताधिष्ठित सामाजिक व्यवस्थेचे ठाम पुरस्कर्ते होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले आणि त्यांच्या हितासाठी ऐतिहासिक योगदान दिले.”
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, “त्यांनी केवळ असमानता दूर करण्याचा मार्ग दाखवला नाही, तर भारताच्या लोकशाही मूल्यांना आणि घटनात्मक हक्कांना बळकटी देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. आंबेडकर यांनी महिलांच्या शिक्षणाला आणि त्यांच्या अधिकारांना प्राधान्य दिले. त्यांच्या बहुआयामी योगदानामुळे पुढील पिढ्यांना देशसेवा आणि विकासात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरणा मिळत राहील. या निमित्ताने आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शांना आपल्या जीवनात आत्मसात करून न्याय्य, समावेशक आणि प्रगतिशील राष्ट्र उभारण्याचा संकल्प करूया.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. राष्ट्रनिर्मितीसाठी केलेले त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन आणि कार्य पिढ्यान्पिढ्या न्याय्य आणि प्रगतिशील समाज उभारण्यासाठी प्रेरणा देत राहील.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode