
मुंबई, 17 एप्रिल, (हिं.स.)। काही दिवसांपूर्वी प्रतिभावान अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ''रंगभूमी खूप मिस करतेय'' अशी मनापासूनची भावना व्यक्त केली होती. चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळायची त्यांची इच्छा यातून स्पष्ट दिसत होती… मात्र संधी मिळत नसल्याची हलकीशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. याच दरम्यान अभिनेता सुनील बर्वे यांनीही आजच्या नवीन पिढीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली… हे सगळे होत असतानाच अभिनेते आणि निर्माते प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांची खास भेट घेतली आणि आपल्या नाटकाची स्क्रिप्ट त्यांना दिली. आणि या भेटीनंतर एक मोठी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे नाटकाची. अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!” असं या नाटकाचं नाव असून, हे नाटक लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे.
‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक प्रिया बापट सादर करत असून निर्मिती सोनल प्रोडक्शन्सची आहे. दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर यांनी सांभाळली आहे. यात हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांच्यासोबत अक्षर कोठारी, शर्मिला शिंदे, शंतनू ठवळी आणि वैशाली आंबवणे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लेखक अमोल पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाची निर्मिती नंदू कदम यांनी केली आहे.
एक मात्र नक्की… इतक्या दमदार कलाकारांची फळी एकत्र आली, तर मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा ''हाऊसफुल''चा बोर्ड झळकणार, यात शंका नाही!
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर