
जळगाव, 25 एप्रिल, (हिं.स.) आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईलमध्ये गुंतली आहेत, अशा वेळी त्यांना मानवी मूल्ये शिकवणारे चित्रपट दाखवणे आवश्यक आहे. या बालचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक भान आणि कलेची आवड निर्माण होईल असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पाल्यांसोबत पालकांना देखिल आपले बालपण अनुभवता यावे या उद्देशाने जळगावात तीन दिवसीय ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन शहरातील भाऊंचे उद्यानात दररोज सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आले आहे. उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले.
महापौर दीपमाला काळे यांचे स्वागत आयोजकांतर्फे जयेंद्र लेकुरवाळे, विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना महापौर काळे यांनी भविष्यातही शहरात अशा उपक्रमांचे आयोजन केल्यास त्याला महानगरपालिका निश्चित सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी,कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे , पालक शाळेचे श्री. रत्नाकर पाटील ,डॉ.विद्या पाटील,शैलेश शिरसाठ,बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते. उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी दाखवण्यात आलेल्या ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपट विजेती फिल्म ‘शाळा सुटली’ तसेच ‘बेबीज डे आउट’ या चित्रपटांना विद्यार्थ्यांनी उस्फुर्त दाद दिली. शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर