
शासनाने फेटाळला निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : नवी मुंबई महापालिका मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय आता ५८ वर्षेच कायम राहणार असून, या निर्णयामुळे प्रशासन आणि कर्मचारी वर्गाला मोठा धक्का बसला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने नव्याने तयार केलेल्या सेवा विनियमात निवृत्ती वय ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव २० मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती.
दरम्यान, या प्रस्तावासाठी राज्य शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचे तसेच तयार करण्यात आलेले सेवा विनियम विद्यमान कायदे व शासन नियमांशी विसंगत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महापालिका प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील तरतुदींचा आधार घेत हा ठराव प्रथमदर्शनी निलंबित केला आहे.
प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. येत्या सहा महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने प्रशासनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडला होता. प्रस्ताव फेटाळल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ला राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सागर नाईक यांनी, “या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू,” असा इशारा दिला आहे.
या घडामोडींमुळे नवी मुंबईतील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)