शस्त्रसंधीनंतरही आखाती देश हाय अलर्टवर; सौदी अरेबिया, कतार आणि युएईमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क
दोहा, 08 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच आखाती देशांमध्ये अलर्ट सायरन वाजू लागले, ज्यामुळे युद्धाचा
शस्त्रसंधीनंतरही आखाती देश हाय अलर्टवर; सौदी अरेबिया, कतार आणि युएईमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क


दोहा, 08 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच आखाती देशांमध्ये अलर्ट सायरन वाजू लागले, ज्यामुळे युद्धाचा धोका अद्याप टळलेला नसल्याचे स्पष्ट झाले. युद्धविराम असूनही कुवैत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतार या देशांमध्ये सुरक्षा यंत्रणा अचानक सक्रिय झाल्या.

अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या शक्यतेमुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला. इस्रायलच्या सैन्यानेही इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचा दावा केला असून त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. कुवैतच्या सैन्याने सांगितले की, त्यांची एअर डिफेन्स प्रणाली सतत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखण्यासाठी कार्यरत आहे. बहरीनमध्येही सायरन वाजवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले. सौदी अरेबियाने अनेक भागांमध्ये इशारे जारी केल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

संयुक्त अरब अमिरातने आपल्या एअर डिफेन्स प्रणाली सक्रिय असल्याची पुष्टी करत हल्ले रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कतारने परिस्थितीला “उच्चस्तरीय धोका” असे वर्णन करत नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. यावरून युद्धविराम असूनही प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे स्पष्ट होते.या संपूर्ण संघर्षाचे मुख्य कारण होर्मुज सामुद्रधुनी ठरली आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर तेलपुरवठा याच मार्गाने होत असल्याने हा मार्ग बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.

इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, हा जलमार्ग पूर्णपणे खुला होईपर्यंत इराणकडून हल्ले सुरू राहू शकतात. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी संकेत दिले आहेत की, अमेरिका आणि इस्रायलने आपले हल्ले थांबवले तर इराणही लष्करी कारवाई थांबवू शकतो.अहवालानुसार, इराणने दोन आठवड्यांचा युद्धविराम स्वीकारला असून चर्चेसाठी तयारी सुरू केली आहे. ही चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, चर्चेचा अर्थ युद्ध संपल्याचा होत नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. सर्व अटी पूर्ण होईपर्यंत संघर्ष संपल्याचे मानले जाणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, युद्धाचा आर्थिक परिणामही मोठा घटक ठरला असून त्यामुळे अमेरिकेने सध्या काही प्रमाणात मवाळ भूमिका घेतली आहे. तज्ज्ञांच्या मते, युद्धविराम पूर्णपणे लागू होण्यासाठी काही काळ लागू शकतो आणि या काळात काही हल्ले सुरू राहण्याची शक्यता आहे, विशेषतः इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान. इस्रायल आपली रणनीतिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र अमेरिकेच्या दबावामुळे परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande