'राजा शिवाजी' रिव्ह्यू: स्वराज्याची खरी ओळख, 'राजा शिवाजी' मध्ये संस्कार आणि रणनीतीचा विजय
इतिहासावर आधारित चित्रपट म्हटले की भव्य युद्धदृश्ये, तलवारींची खणखण आणि राजकीय संघर्ष हेच केंद्रस्थानी असतात. मात्र ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी वेगळा मार्ग निवडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील ‘संस्कार’
राजा शिवाजी

 
 
 
रेटिंग : (4/5)
इतिहासावर आधारित चित्रपट म्हटले की भव्य युद्धदृश्ये, तलवारींची खणखण आणि राजकीय संघर्ष हेच केंद्रस्थानी असतात. मात्र ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी वेगळा मार्ग निवडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील ‘संस्कार’, ‘दूरदृष्टी’ आणि ‘रणनीती’ यांवर विशेष भर दिला आहे. हा चित्रपट स्वराज्याची उभारणी केवळ युद्धाने नव्हे, तर विचार, संघटनशक्ती आणि जनतेच्या विश्वासावर कशी झाली, हे प्रभावीपणे मांडतो.
दिग्दर्शनाच्या पातळीवर रितेश देशमुख यांची ही मोठी झेप म्हणावी लागेल. प्रत्येक फ्रेममध्ये मराठा अस्मितेचा आदर जाणवतो. कथानक प्रकरणांमध्ये उलगडत जात असल्याने शिवचरित्राचा व्यापक पट प्रेक्षकांसमोर स्पष्टपणे उभा राहतो. दृश्यरचना आणि भावनिक मांडणी यांचा समतोल चित्रपटाला अधिक परिणामकारक बनवतो.
पात्रांच्या बाबतीत चित्रपट अत्यंत समृद्ध आहे. संजय दत्त यांचा अफझल खान प्रभावी आणि दमदार आहे, तर फरदीन खान यांनी औरंगजेबच्या भूमिकेत गंभीरता आणली आहे. अभिषेक बच्चन यांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेत भावनिक गुंतागुंत उत्कृष्टरीत्या साकारली आहे. विद्या बालन, सचिन खेडेकर आणि अमोल गुप्ते यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक खोली प्राप्त होते.
चित्रपटातील भावनिक क्षण विशेष उल्लेखनीय आहेत. आई जिजाऊंचे संस्कार, बाल शिवरायांची जिज्ञासा (राहिल देशमुख) आणि कुटुंबातील नात्यांचे चित्रण प्रेक्षकांच्या मनाला भिडते. जेनेलिया देशमुख यांचा निर्माती आणि कलाकार म्हणून असलेला सहभाग चित्रपटाला एक मानवी आणि संवेदनशील स्पर्श देतो.
‘राजा शिवाजी’ हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नाही, तर महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि स्वाभिमानाचा भव्य गौरव आहे. रणांगणापलीकडील विचारांची ही कहाणी प्रत्येक प्रेक्षकाला प्रेरित करते. प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येईल, असा हा सिनेमा आहे.
 
 
---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande