
कोल्हापूर, 31 मे (हिं.स.)। केंद्र शासनाच्यावतीने राज्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोचतो की नाही, यावर देखरेख करण्यासाठी केंद्र शासनाने जिल्हावार विद्युत समिती बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हयाची विद्युत समिती बनवण्यात आली असून, त्याचे अध्यक्ष म्हणून खा. धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर खा. धैर्यशील माने आणि खा. श्रीमंत शाहू महाराज यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत, खा. महाडिक यांनी केंद्र शासनाच्या सर्व विद्युत विषयक योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोचवण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करू आणि योजनांच्या अंमलबजावणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणू, अशी ग्वाही दिली.
केंद्र शासनाच्यावतीने सुधारीत वितरण क्षेत्र योजना (आर डी एस एस), पीएम ई बस, पीएम सुर्यघर मुफ्त बिजली योजना अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि या योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग नोंदवण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय विद्युत समिती बनवण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांची निवड झाली आहे. तर खासदार धैर्यशील माने आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याशिवाय पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्हयातील आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा आणि महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांचा समितीत समावेश आहे. दरम्यान विद्युत समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्र शासनाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाच्या विद्युत विषयक सर्व योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. खासदार महाडिक यांच्या निवडीमुळे केंद्र शासनाच्या विविध योजना महावितरणच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोचतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar