
कोलकाता, 04 मे (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत रात्री 9.46 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सत्ता परिवर्तनाचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील 293 जागांपैकी बहुमतासाठी 147 जागांची आवश्यकता असून भाजपने 158 जागांवर विजय संपादित केला असून 50 जागांवर भाजप उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला आहे.
निवडणूक आयोगाकडून रात्री 9.45 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने आतापर्यंत 158 जागांवर विजय मिळवला असून 50 जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. तर तृणमूल काँग्रेसने 55 जागांवर विजय मिळवला असून 24 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला 2 जागा मिळाली असून डाव्या पक्षांनाही 2 जागेवर विजय मिळाला आहे. या निकालांमुळे पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, राज्यात बदलाची लाट निर्माण झाली असून मतदारांनी सत्तांतराचा स्पष्ट संकेत दिला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ राज्यात पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. तसेच विविध घटनांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.दरम्यान, मतमोजणी सुरूच असून अंतिम निकालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील राजकीय वातावरण सध्या अत्यंत तापलेले असून सर्वांचे लक्ष अंतिम आकडेवारीकडे लागले आहे.
तृणमूलच्या पराभवाची प्रमुख कारणेराजकीय विश्लेषकांच्या मते, या पराभवामागे अनेक मोठे मुद्दे कारणीभूत ठरले आहेत.
त्यामध्ये आर.जी. कर मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि हत्या प्रकरण,
ईडीची आय-पॅक संबंधित चौकशी आणि छापे,
मुर्शिदाबादमधील हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न,
केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेला वाद,
विरोधकांकडून वाढलेला भ्रष्टाचार आणि प्रशासनावर आरोप यांचा समावेश आहे.
या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले असून राज्यात नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. ममता बनर्जी यांच्या 15 वर्षांच्या दीर्घ सत्ताकाळाचा अध्याय संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी