आम्ही दहशतवादाच्या संपूर्ण यंत्रणेचा नायनाट करण्याच्या निर्धारावर कायम ठाम - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली , 07 मे (हिं.स.) पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य, अचूकता आणि दृढनिश्चयाला सलाम केला. त्
आम्ही दहशतवादाच्या संपूर्ण यंत्रणेचा नायनाट करण्याच्या निर्धारावर कायम ठाम - पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 07 मे (हिं.स.) पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य, अचूकता आणि दृढनिश्चयाला सलाम केला. त्यांनी म्हटले की, या मोहिमेमुळे दहशतवादाविरोधातील भारताची कठोर भूमिका, सैन्य दलांमधील उत्कृष्ट समन्वय आणि संरक्षण क्षेत्रातील वाढती आत्मनिर्भरता जगासमोर ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त लिहिले की, एक वर्षापूर्वी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरदरम्यान अद्वितीय शौर्य दाखवत पहलगाममध्ये निरपराध भारतीयांवर हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातील भारताच्या कठोर धोरणाचे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी असलेल्या अढळ निर्धाराचे प्रतीक आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या मोहिमेमुळे भारतीय सैन्याची व्यावसायिक क्षमता, सज्जता आणि परस्पर समन्वय जगासमोर ठळकपणे दिसून आला. तसेच संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी भारताने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचेही या अभियानातून स्पष्ट झाले. पुढे ते म्हणाले की, एक वर्ष उलटल्यानंतरही भारत दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचा नायनाट करण्याच्या आपल्या निर्धारावर कायम ठाम आहे.

पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या या नापाक कटाला आणि कारवायांना भारताने दुर्लक्षित न करता पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घुसून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

७ मेच्या पहाटे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी प्रशिक्षण छावण्यांवर अचूक हवाई हल्ले केले. या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले आणि त्यांची संरचना उद्ध्वस्त करण्यात आली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले गेले.

या ऑपरेशनच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते की, ऑपरेशन सिंदूरने एक नवे संरक्षण तत्त्व स्थापित केले आहे — “भारतावर कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याची मोठी किंमत दहशतवाद्यांसह त्यांच्या समर्थकांनाही (पाकिस्तानला) चुकवावी लागेल आणि भारत कोणत्याही अणु धमक्यांसमोर झुकणार नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande