मोर्शीतील पुलासाठी काँग्रेसचा 'करो या मरो' आंदोलनाचा इशारा
अमरावती, 19 जून (हिं.स.) : मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसांत सुरू न झाल्यास ''करो या मरो'' आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी यासंदर्भात उपवि
मोर्शीतील अर्धवट पुलासाठी काँग्रेसचा 'करो या मरो' इशारा


अमरावती, 19 जून (हिं.स.) : मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसांत सुरू न झाल्यास 'करो या मरो' आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत प्रशासनाला आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे.

नांदगाव पेठ ते पांढुर्णा या रस्त्याचे बांधकाम चार ते पाच वर्षांपासून पूर्ण झाले असले तरी, नळा नदीवरील पुलाचे काम रखडले आहे. हा दुतर्फा पूल एका बाजूने पूर्ण झाला असून, दुसरी बाजू अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.हा मुख्य महामार्ग तीर्थक्षेत्र सालबर्डीकडे जाणाऱ्या मार्गालगत असल्याने वाहतूक कोंडी होते. काही दिवसांपूर्वी वरुडहून अमरावतीकडे धान्य घेऊन जाणारा एक आयशर ट्रक याच ठिकाणी नदीकाठावरील खड्यात उलटला होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. वरुड-मोर्शी मार्गे चांदूरबाजार जाणारी एक कारही याच ठिकाणी उलटली होती.

वरुडकडून येणाऱ्या वाहनचालकांना दुसऱ्या बाजूने येणारे वाहन दिसत नाही, त्यामुळे येथे वारंवार अपघात घडत आहेत. सालबर्डी येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते आणि येथूनच वळण रस्ता असल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे. हा अर्धवट पूल मोर्शीकर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.यापूर्वी अनेक सामाजिक संघटनांनी या पुलावर रास्ता रोको आंदोलने केली आहेत. वर्धेचे खासदार अमर काळे आणि माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी आठ दिवसांत पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते अद्यापही सुरू झालेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande